आला आला पावसाळा!

कडाक्याच्या उन्हाच्या झळा सोसल्याशिवाय पावसाचे महत्त्व जाणवत नाही हे खरे!  ह्या वर्षी भारतातला उन्हाळा अनुभवला नाही पण अमेरिकन टेक्सास चा कडक उन्हाळा अनुभवला .तपमान १००° फॅरनहाईट ला पोचले होते. पण वाॅटरपार्क ,कारंजी, पोहण्याचा तलाव यामुळे ऊन्हाळा सुसह्य  होता.


पावसात आपल्याला आनंद होतोच पण ही झाडे काय विचार करत असतील? मला एकदा भर पावसात महाबळेश्वरला फिरताना झाडांनीच हे गुज 

 नभात झाली कृष्णघनांची गर्दी
कडाडून विजेने दिली पावसाची वर्दी सोसाट्य़ाच्या वार्‍यासंगे उडे पाचोळा गर्द
दाट झाडी डोले हाले होई रान सर्द सर्द
 आता पुढे होइल हो अमृताचा वर्षाव
आता नाही सोसायाचे कुर्‍हाडीचे दुष्ट घाव
फुला फुला रे सारे फुटो नवे नवे कोंब
गुलमोहर बोले,चाफा सांगे रानी झाडे चिंब चिंब!

निसर्गाचा असा जल्लोष सुरू झाला की धरती थरारते. गवताची नाजूक पाती तिच्यावर आपली मायेची झूल पांघरतात. त्या हिरवाईने माखलेली धरती पाहून पाऊस आणखीच चेकाळतो जणू! त्याचा हल्लागुल्ला सुरू होतो.सैराटासारखा कोसळत तो सारे नद्यानाले इतके भरतो की तेसुद्धा आपली मर्यादा सोडून उफाणून वाहू लागतात. सागरही गर्जू लागतो. पावसाळी ढगांना भेटायला लाटासुद्धा मर्यादा सोडून उसळू लागतात.

असा हाहाकार माजला की कौतुकाच्या  पावसाला सारे रागेजू लागतात. कळवळून नको नको रे पावसा असे आळवू लागतात. मग हा राजा जरासा वरमतो , थांबतो आणि पुन्हा कमी जास्त बरसू लागतो.
पावसाळा सृजन सोहळा धरतीचा !!




Comments

Popular posts from this blog

गांधींबद्दल

मराठी अक्षरे ङ आणि ञ

वेदना